Logo

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

गुंतवणुक विश्वाचे नियम

 

सध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरु आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. ‘दोन-तीन वर्षे चालु ठेवलेल्या SIP मधे नुकसान कसे काय दिसतेय?’ असा जाब देखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेयतर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना याची शंका येतेय. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांचा हा सगळा सार्वजनिक गोंधळ उडालेला आहे तो या खेळाचे नियम त्यांनी समजून घेतले नाहीत म्हणून.

इक्विटी किंवा शेअर्स मधील गुंतवणूक ही केवळ आर्थिक ज्ञानाशी निगडीत नसते. तर त्यात लोकांच्या भावभावनांचे तरंग उमटत असतात. त्यामुळे गुंतवणुकीचे नियम म्हटले हे लोकांच्या ‘हावरेपणा’, ‘पराकोटीची भीती’ अशा भावना किंवा लोक सामान्यपणे जोखीमपरताव्याविषयीच्या अपेक्षा, एखाद्या गोष्टीचा तुटवडा अशा परिस्थितीत कसे वागतात यांचे वर्णनच ठरेल.

शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत पहिला नियम हा आहे की तेजी किंवा मंदी या अवस्था नेहेमीच प्रमाणाबाहेर पसरतात. कारण जेव्हा यातील कुठल्याही अवस्थेतून बाजार जात असतो तेव्हा कोणालाच त्याच्या मर्यादांचे भान नसते. शेअर्सच्या किमती त्यांच्या उचित मूल्यापेक्षा फार दूर पोचलेल्या असतात. शेवटी एखाद्या शेअरचे मूल्य त्यासाठी कोण किती किंमत मोजायला तयार आहे त्यावर ठरत असते. आणि विकत घेणाऱ्याला भविष्याविषयी काय वाटते त्यावर ते अवलंबून असते. ज्याप्रमाणे एखाद्या अंध व्यक्तीला काठी आपटल्याशिवाय समोर भिंत आहे हे लक्षात येऊ शकत नाहीत्याचप्रमाणे जोपर्यंत तेजी किंवा मंदीची स्थिती मर्यादेबाहेर जात नाही तोपर्यंत हे चक्र पलटवायला पुरेसे गुंतवणूकदार एकत्र होत नाहीत. त्यामुळेच बाजार वर जातानाचा सर्वोच्च बिंदू किंवा पडतानाचा नीचतम बिंदू हाच असे आधीच सांगता येत नाही.

गुंतवणुकीचा दुसरा नियम म्हणजे स्थैर्याच्या काळातच अस्थैर्याचे बीज पेरले जात असते. शेअर बाजारात कधीच पडझड झाली नाहीतर तिथल्या गुंतवणुकीत काहीच जोखीम उरणार नाही. जोखीम नसेल तर तिथे लोक अमर्याद गुंतवणूक करतील. त्याने शेअर्सची मुल्यांकनं गगनाला भिडतील. आणि मग धाडकन कोसळण्याला पर्याय उरणार नाही. हीच गोष्ट अर्थव्यवस्थेतील तेजी-मंदीला देखील लागू पडते. अर्थव्यवस्था व्यवस्थित चाललेली असते तेव्हा लोक आणि औद्योजक कर्ज काढून मोठं व्हायचा प्रयत्न करतातपण अशा अमर्याद घेतलेल्या कर्जांच्या बोज्याखाली शेवटी अर्थव्यवस्था थकून जाते आणि मंदी येते.

गुंतवणुकीचा तिसरा नियम म्हणजे ‘नशीब’ आणि ‘जोखीम’ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थकारणात आणि गुंतवणूक विश्वात बहुतेक सर्व गोष्टी या संभाव्यतांचा भाग असतात. कितीही अभ्यासपूर्ण असले तरी आपले गुंतवणुकीचे निर्णय योग्य आहेत का ते भविष्यातील घटनांवर ठरत असतेत्यामुळे ते चुकण्याची शक्यता असते. ही ‘जोखीम’ झाली. आणि निर्णय योग्य येऊनही आपले नुकसान होऊ शकते. हा दैवाचा भाग झाला. या दोन्हींच्या योगाने आपल्या गुंतवणुकींवर परतावा मिळत असतो, मात्र आपण सहसा ‘नशीब’ हा घटक विचारात घेत नाहीत. जेव्हा आपण गुंतवणुकीतील ‘जोखीम’ या अंगाचा विचार करतो तेव्हा हे लक्षात येते की अनेक गोष्टी आपल्या ताब्यात नाहीत. मात्र केवळ सुदैवाने – निर्णय चुकीचे घेऊन सुद्धा – आपला फायदा झाला असेल तर स्वतःच्या निर्णयप्रक्रियेविषयी आपण गैरसमज करून घेतो.

पुढचा नियम म्हणजे बाजारात बहुतांश वेळा एका लहान कालखंडात फार मोठे चढउतार घडतात. तसेच पोर्टफोलिओमधील २०% कंपन्याच ८०% परतावा मिळवून देतात. त्यामुळे कोळी लोक जसे समुद्रात जाळं टाकून वाट बघत बसतात तसंच गुंतवणूकदाराला बराच काळ वाट बघावी लागू शकते. त्यामुळे गुंतवणुकीच्या विश्वात संयम आणि चिकाटी यांना पर्याय नाही.

पाचवा नियम म्हणजे गुंतवणूकविश्वात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळ्या धोरणांची गरज असते. ज्या पद्धतीने गेल्या वर्षी परतावा मिळाला तीच पद्धत या वर्षी चालेल असे नाही. बेन्जामिन ग्रहम या सुप्रसिद्ध गुंतवणूकतज्ञाने स्वतःच्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या काढल्या – प्रत्येक आवृत्तीत यशस्वी गुंतवणुकीसाठी दिलेले आराखडे जुने बदलून नवीन दिले आहेत. कारण एखाद्याने शोधून काढलेला मार्ग बऱ्याच लोकांनी चोखाळायला सुरुवात केली की त्यातील नफ्याची शक्यता शून्य होते.

सहावा महत्त्वाचा नियम म्हणजे गुंतवणूकदारांची आणि म्युच्युअल फंडाचा मॅनेजर्सची गुंतवणूक उद्दिष्टे यांचा परस्परांशी मेळ असतोच असे नाही. म्युच्युअल फंड मॅनेजर्स बहुतांशी पुढील १-३ वर्षांचा काळ डोळ्यासमोर ठेऊन गुंतवणुकीचे निर्णय घेत असतात. अनेकदा त्याहीपेक्षा जास्त कालावधीसाठी त्यांना गुंतवणुकी करायच्या असतात. बाजारातील पडझड ही त्यांच्यासाठी ‘नेमेची येतो मग पावसाळा’ अशी नैसर्गिक गोष्ट असते. मात्र सामान्य गुंतवणूकदार जर परताव्यासाठी अधीर असला किंवा गेल्या ३-६ महिन्यातील पडझडीमुळे फंड मॅनेजरच्या कौशल्याविषयी शंका घेऊ लागला तर ते गुंतवणुकी काढून घेण्यास सुरुवात करतात. परिणामतः फंड मॅनेजरला देखील त्याने केलेल्या गुंतवणुकी विकाव्या लागतात, आणि त्यामुळे त्याची कामगिरी ढासळते. फंड मॅनेजर्स आणि सामान्य गुंतवणूकदार यांची उद्दिष्टे नुकसान कमी करून फायदा वाढवण्याचे जरी असले तरी कालखंडाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने दोघांनाही त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणजे फंड मॅनेजर्सनी गुंतवणूकदारांसोबत नियमित संवाद साधला पाहिजे, आणि सामान्य गुंतवणूकदारांनी ह्या घटकाची योग्य दखल घेऊन मगच गुंतवणूक पर्याय निवडले पाहिजेत.

गुंतवणूक विश्वातील सातवा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गुंतवणुकीवरील वर्तणुकीचा परिणाम हा ज्ञानाच्या परिणामापेक्षा फार जास्त असतो. याचे मुलभूत कारण म्हणजे ज्ञान शिकवता येऊ शकते पण वर्तणूक शिकवून बदलत नसते. आजच्या घडीला आर्थिक विषयातील ज्ञान आणि माहिती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्याला स्वतःच्या तब्येतीविषयी असणार नाही एवढी माहिती स्टेट बँकेच्या आर्थिक स्थितीविषयी आपण मिळवू शकतो. आजच्या घडीला कोणालाही काहीही माहिती मिळू शकते. मात्र भीतीहावउताविळपणा, अतिआत्मविश्वास अशा सारख्या मानवी भावभावनांना कोण आवर घालू शकतेया सर्वांचा फार मोठा परिणाम आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर आणि त्यातून मिळू शकणाऱ्या परताव्यावर होत असतो.

असे हे नियम समजून घेतल्यास गुंतवणूक विश्वातील बदलचढउतार, कठीण प्रसंग किंवा अनपेक्षित गोष्टी आपण सहज समजून घेऊ शकतो आणि त्यानुसार आपल्या निर्णयात सुसूत्रता ठेवू शकतो. गुंतवणुकीचे दीर्घकालीन लाभ मिळवण्यासाठी ह्या नियमांचे ज्ञान प्रत्येकालाच असणे अनिवार्यच आहे.

 

--- प्राजक्ता कशेळकर